मुंबई
maharashtra gharkul राज्यात कुठेही घरकुल आणि जलजीवन मिशनच्या कामांमध्ये अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून कमिशनची मागणी होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सभागृहात जाहीर केले.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गोरे बोलत होते. लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या कोणत्याही हप्त्यासाठी पैसे देण्याची गरज नसल्याची माहिती पंचायत समिती कार्यालयांमध्ये ठळक फलकांद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या फलकांवर संबंधित सचिव तसेच मंत्र्यांचे संपर्क क्रमांकही नमूद करण्यात येतील, जेणेकरून कोणी पैशांची मागणी केल्यास नागरिकांना थेट तक्रार करता येईल, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.