मुंबई
postmortem राज्यातील शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, मुंबईत लवकरच नॉन-इन्वेसिव्ह पोस्टमॉर्टेम (शरीराची चिरफाड न करता शवविच्छेदन) तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना, राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून, गेल्या दोन ते तीन वर्षांत प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सध्या ५३३ शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज postmortem सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत १० हजार ९०५ शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या समयबद्ध पद्धतीने दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.