टीम इंडियाच्या नावावर दोन नकोसे विक्रम

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Team India's Navavar Don Nakose Vikram इंग्लंडने ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा तब्बल नऊ गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दोन्ही संघांतील पाचवा आणि अखेरचा सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे.या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १५८ धावा केल्या. सुरुवातीलाच ४८ धावांत तीन फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र कर्णधार श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारत शानदार खेळी केली. त्याने शिवम दुबेच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ५३ धावांची भागीदारी उभारली. दुबेने २३ चेंडूत २२ धावा केल्या, तर अय्यरने ४९ चेंडूत ८० धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच्या खेळीत पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता.
 
 

Team India 
 
१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला जॉस बटलरच्या रूपाने २.३ षटकांत आठ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूक आणि फिल सॉल्ट यांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ६८ चेंडूत नाबाद १४६ धावांची भागीदारी केली. ब्रूकने ३५ चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावा फटकावल्या, तर फिल सॉल्टने ४२ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. इंग्लंडने हे लक्ष्य केवळ १३.५ षटकांत पूर्ण करत ३७ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.या पराभवासह भारताच्या नावावर दोन नकोसे विक्रमही नोंदवले गेले. १५० पेक्षा अधिक धावा करूनही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा चेंडू शिल्लक असताना झालेला हा सर्वात मोठा पराभव ठरला. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात चेंडू शिल्लक असताना भारताचा हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव म्हणूनही या सामन्याची नोंद झाली.