मुंबई
thackeray sena राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत असल्याची चर्चा सुरू असतानाच आता नाशिक महानगरपालिकेतील काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. सहा खासदारांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर नाशिकमधील 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
भूमिका स्पष्ट..
या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नाशिक thackeray sena महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाने गटनेता कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी गटनेते केशव पोरजे यांनी पक्षातील नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चांना फेटाळून लावले.केशव पोरजे म्हणाले, “कोणतेही नगरसेवक फुटणारे नाहीत. काल आम्ही आयुक्तांना निवेदन दिले तेव्हा 13 नगरसेवक उपस्थित होते. ही केवळ अफवा आहे. आम्ही एकमेकांकडे संशयाने पाहावे, असा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात कोणाला मोठ्या पदाची इच्छा असेल तर ते त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना उपमहापौर व्हायचे आहे, म्हणून ते आमच्याकडे एजंट पाठवत आहेत.”यावेळी त्यांनी आर्थिक प्रलोभन दिल्याचा आरोपही केला. “त्यांचा एक एजंट आमच्याकडे पाठवला जातो. पाच कोटी रुपयांची ऑफर दिली जाते. पाच ते सहा नगरसेवकांना ते भेटले आहेत. विकासकामांसाठी पाच कोटी रुपये देण्याची ऑफर दिली जात आहे,” असा दावा केशव पोरजे यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “कालच आम्ही मनपा आयुक्तांची भेट घेतली. आम्हाला निधी मिळत नाही, अधिकारी लक्ष देत नाहीत. नगरसेवकांकडे दुर्लक्ष केले जाते, निधी दिला जात नाही. त्यामुळे ते कंटाळून पक्षप्रवेश करतील, असा प्रयत्न केला जात आहे. पाच कोटींच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या चर्चा राम मंदिरावरील लक्ष विचलित करण्यासाठी पसरवल्या जात आहेत.”
नगरसेवक पक्ष सोडून गेल्यास त्यांना अपात्र ठरवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “जे दोन-चार नगरसेवक घेऊन जातील ते अपात्र ठरतील. खासदार फुटल्यानंतरही आम्ही तुडवा म्हणून सांगितले होते. जे नगरसेवक जातील त्यांना जनता तुडवेल,” असे केशव पोरजे म्हणाले.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या 10 ते 12 नगरसेवकांमध्ये शिंदे गटात जाण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपल्या नगरसेवकांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत 15 पैकी केवळ 5 नगरसेवक उपस्थित असल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.