अन्यथा सर्वपक्षीय तीव्र आंदोलन छेडणार
शेंबाळपिंपरी,
apar tehsil karyalay अपर तहसील कार्यालय शेंबाळपिंपरी येथेच झाले पाहिजे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित अपर तहसील कार्यालय समर्थक, नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली. बैठक डॉ. अजित चंदेल यांच्या अध्यक्षतेत शेंबाळपिंपरी, बेलोरा व खंडाळा या तिन्ही महसूल मंडळातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याचे व विश्वासात घेऊन एक अपर तहसील कार्यालय समर्थनार्थ कृती समिती स्थापन करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
महसूलमंत्री बावनकुळे, पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी व पुसद तहसीलदारांच्या भेटी घेऊन लेखी निवेदने देण्याचे व गरज पडल्यास सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. डॉ. अजित चंदेल यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर बैठकीचा समारोप करण्यात आला.
सरपंच तथा प्रशासक रवींद्र महल्ले, जैनुला सिद्दीकी, डॉ. नंदकुमार देशमुख, कोंडबा मनवर व चंद्रकला अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर माजी प्राचार्य विजय वाकडे, दिलीप देशमुख, डॉ. राहुल सिरसाट, गणेश पागिरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय साकला, मुनीरोद्दीन सिद्दीकी, निवृत्ती वाहूळे, अपसर नाईक, डॉ. गजानन मनवर व सुनील वाहूळे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन गुलाब वाहूळे यांनी केले.