Sprinkler irrigation जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावून बळीराजाला दिलासा देणार्या पावसाने आता अचानक दडी मारली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंबही पडला नाही. ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली पीके आता पाण्याच्या अभावी संकटात सापडली आहेत. विशेषतः सुरुवातीला पेरणी झालेल्या कपाशी व सोयाबीनचे पिक कोमेजू लागल्याने शेतकर्यांची चिंता कमालीची वाढली आहे.
डोळ्यांदेखत पीक जळून जाऊ नये म्हणून ज्या शेतकर्यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी भर पावसाळ्यातही तुषार सिंचनाचा आधार घेत पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. जिल्ह्यात ज्या शेतकर्यांकडे विहीर किंवा बोअरवेलसारखी सिंचनाची साधने उपलब्ध आहेत, ते कपाशी व सोयाबीनला पाणी देऊन पीक जगवत आहेत. मात्र, जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. कपाशी व सोयाबीनचे पीक सध्या वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून, या काळात त्याला पाण्याची नितांत गरज असते. नेमक्या याच वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजाच्या चेहर्यावर आता चिंतेचे ढग दाटून आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.