कारागृहाच्या चिरेबंदी भिंतीही झाल्या भावूक

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
- १६६ बंद्यांच्या २८३ पाल्यांनी घेतली आई-वडिलांची भेट;

अनिल कांबळे
नागपूर :
Nagpur Central Jail अनेक महिन्यांपासून आई-वडिलांच्या मिठीसाठी आसुसलेल्या चिमुकल्यांना अखेर आपल्या पालकांना घट्ट मिठी मारण्याची संधी मिळाली आणि कारागृहातील कठोर भिंतीही त्या भावनिक क्षणांच्या साक्षीदार ठरल्या. महाराष्ट्र कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहात शनिवारी 'गळाभेट' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
 
jail dsl
 
या उपक्रमाअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या पुरुष व महिला बंद्यांच्या १८ वर्षांखालील मुलांना, भावंडांना आणि नातवंडांना कारागृहात प्रत्यक्ष भेटण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमात १६६ बंद्यांच्या २८३ पाल्यांनी आपल्या आई-वडिलांची तब्बल ३० मिनिटे प्रत्यक्ष भेट घेतली. सुरुवातीला भीती, संकोच आणि अनोळखीपणामुळे काही मुले गप्प उभी होती. मात्र काही क्षणांतच त्यांनी वडिलांच्या कुशीत शिरत त्यांना घट्ट मिठी मारली. काही जण बाबांच्या खांद्यावर खेळले, तर अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. त्या क्षणी कारागृहाचे वातावरणही भावनांनी भारावून गेले.
आईवरील कविता केली सादर
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. आयचित यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी, ‘माणसाकडून नकळत गुन्हा घडू शकतो. मात्र त्यातून बाहेर पडून वाल्याचा वाल्मीकी झाला, तसा प्रत्येकाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवावा,’ असा संदेश बंद्यांना दिला. कार्यक्रमादरम्यान एका बंद्याच्या मुलाने आईवरील स्वतःची कविता सादर केली, तर अवघ्या सहा वर्षांच्या मुलीने गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्यांनी या दोन्ही बालकांचे विशेष कौतुक केले. भेटीदरम्यान बंद्यांना आपल्या मुलांसाठी बिस्किटे, चॉकलेट, वेफर्स, सोनपापडी, चिवडा यांसारख्या खाद्यपदार्थांची व्यवस्था कारागृहातील उपहारगृहातून उपलब्ध करून देण्यात आली. अनेकांनी आपल्या कारागृहातील वेतनातून मुलांसाठी खाऊ घेतला आणि स्वतःच्या हाताने भरवला. कारागृह प्रशासनानेही सर्व पाल्यांना पुलाव, फळे आणि अल्पोपहार दिला.
 
 
निरोपाच्या वेळी पाणावले डोळे
बंदी आणि त्यांच्या मुलांची भेट संपल्यानंतर निरोपाची वेळ आली, तेव्हा अनेक चिमुकल्यांचे डोळे पाणावले. पुन्हा कधी भेट होईल, या प्रश्नाने मुलांसह बंद्यांच्याही डोळ्यांत अश्रू दाटले. कारागृहाच्या भिंतींमध्ये घडलेला हा गळाभेटीचा क्षण केवळ भेट नव्हती, तर तुटलेल्या नात्यांना पुन्हा जुळवून देणारा, आशा आणि पुनर्वसनाचा हळवा स्पर्श होता.
 
 
२२० मुलांना शैक्षणिक साहित्य
केवळ भावनिक भेटीपुरताच हा उपक्रम मर्यादित राहिला नाही. घरातील कमावता सदस्य कारागृहात असल्यामुळे मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने प्रयास टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई, हाऊसेस ऑफ मेरी इमॅक्युलेट, नागपूर आणि मेरी सेलियन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २२० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, पाठ्यपुस्तके, वह्या, कंपास पेटी, टिफिन बॉक्स, पाण्याची बाटली आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक (पूर्व विभाग) वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मनोहर भोसले यांच्यासह अधिकारी-कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.