ऑकलंड
pm modi न्यूझीलंड दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी यांनी ऑकलंड येथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपली एक भावूक आठवण सांगितली. सरकारमध्ये नसताना न्यूझीलंड दौऱ्यावेळी एका न्यूझीलंडवासीयाने दिलेले मफलर अनेक वर्षे वापरले आणि आजही ते जपून ठेवले आहे. न्यूझीलंडच्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाप्रमाणेच त्यांनी दिलेल्या वस्तूंना मी जपतो असेही ते म्हणाले. भारत आणि न्यूझीलंडमधील एक प्रमुख साम्य म्हणजे दोन्ही देशांच्या मूळ संस्कृतींचा आदर आणि त्यांचे जतन करणे आहे. दोन्ही देशांमध्ये शब्द, भाषा, पोशाख आणि पर्यावरण वेगवेगळे असले तरी, त्यांची मूळ मूल्ये आणि परंपरा समान आहेत. भारताच्या विजयाचा जल्लोष न्यूझीलंडमध्ये होतो. जेव्हा भारताचे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले, तेव्हा संपूर्ण न्यूझीलंडने त्या यशाचा उत्सव साजरा केला होता. या मोहिमेच्या यशात न्यूझीलंडच्या तंत्रज्ञानानेही योगदान दिले.
दोन्ही देश आता अंतराळ क्षेत्रात ही भागीदारी आणखी वाढवण्यासाठी काम करत आहेत.भारताला रग्बीच्या क्षेत्रात न्यूझीलंडकडून शिकायचे आहे. यासाठी भारताला अनुभवी प्रशिक्षक आणि तज्ञांची गरज आहे. भारत आणि न्यूझीलंड क्रीडा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकत्र मिळून मोठे यश मिळवू शकते. दोन्ही देशांचे भविष्य एकमेकांशी जोडलेले आहे आणि क्रीडा सहकार्य या भागीदारीला नवीन बळ देईल. आज सहकार्याचे युग आहे आणि भारत व न्यूझीलंड क्रीडा क्षेत्रात एकत्र मिळून नवीन उंची गाठू शकतात.
न्यूझीलंड हा एक असा देश आहे जिथे भारतीय वंशाच्या लोकांना त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर उच्च पदांवर पोहोचण्याची संधी मिळते. निखिल रविशंकर एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले, आनंद सत्यानंद गव्हर्नर-जनरल पदापर्यंत पोहोचले, तर रचिन रवींद्र, इश सोधी आणि एजाज पटेल यांसारख्या खेळाडूंनी न्यूझीलंड क्रिकेट संघात आपली छाप सोडली. न्यूझीलंडमधील अनेक रस्ते आणि ठिकाणांना भारतीय शहरे आणि ठिकाणांची नावे देण्यात आली आहेत. न्यूझीलंडमध्ये राहणारा भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दुवा आहे.