काळाचा थरार! १५० फूट दरीत कार कोसळून तिघांचा मृत्यू

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
सिरमौर,
car plunges into 150 foot gorge हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. नाहन-कुमारहट्टी-शिमला राष्ट्रीय महामार्ग (एनएच-९०७ए) वरील एका तीव्र वळणावर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळले. अपघातावेळी कारमध्ये चार जण प्रवास करत होते.

accident
 
या दुर्घटनेत ४८ वर्षीय रीना शर्मा, ६५ वर्षीय अधिकारी जेटली आणि ६० वर्षीय उर्मिल जेटली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिला शिक्षिकेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघेही सिरमौर जिल्ह्यातील रहिवासी होते. अधिकारी जेटली यांचा ३३ वर्षीय मुलगा यशस्वी जेटली गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नाहन येथील डॉ. वाय. एस. परमार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
दरम्यान, राजस्थानातील बालोत्रा जिल्ह्यातही रविवारी रात्री भीषण अपघात झाला. बारमेर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावर भाडियावास गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एसयूव्हीची पुढे असलेल्या ट्रकच्या मागील भागावर जोरदार धडक बसली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. धडकेनंतर एसयूव्हीचा चक्काचूर झाला आणि प्रवासी वाहनात अडकले. स्थानिकांनी पोलिसांच्या येण्यापूर्वीच जखमींना बाहेर काढून बालोत्रा येथील नाहटा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले, तर पाच गंभीर जखमींना जोधपूरला हलविण्यात आले. उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.