कारंजा (घा.),
senior-citizen-dialogue-initiative : येथील पोलिस स्टेशनच्या सभागृहात १५ रोजी ज्येष्ठ नागरिक संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय पोलिस अधिकारी सरीता चव्हाण यांनी ज्येष्ठांसोबत संवाद साधताना त्यांना दैनंदिन जीवनात उद्भवणार्या समस्या आणि त्याबाबत पोलिसांकडून करण्यात येऊ शकणारे सहकार्य याबाबत माहिती दिली. ज्येष्ठांना कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्यांनी थेट पोलिसांना फोन करून सांगावं असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या सभोवती समाजात विशेषता पौगंडावस्थेतील मुलामुलींचे असामाजिक तत्त्वांच्या आहारी जाण्याचे लक्षणीय प्रमाण वाढत आहे. ही बाब आपण सर्वासाठी चिंताजनक आहे. त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन समाजाची विस्कटू घातलेली घडी नीट करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ नागरीक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष प्रा. सुभाष अंधारे यांनी या प्रसंगी आपले मत व्यक्त केले. अशोक पालीवाल, विनोद दंढारे, अरविंद चरडे, चंदू भुयार, प्रकाश चौधरी, प्रा. अनिस मुल्ला, दिलीप राठी, प्रदीप शेटे, मधुसूदन डोबले, भिकमचंद राठी आदींनी ज्येष्ठांना उद्भवणार्या समस्या सांगून संवाद उपक्रमात सहभाग नोंदवला. आयोजक तथा ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप शेटे यांनी आभार मानले.