नागपूर,
public transport system मेट्रो आणि ‘आपली बस’ या नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांचे नियोजन आणि समन्वयाचा मोठा अभाव आहे. मेट्रो आणि मनपाच्या परिवहन विभागात ‘मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन’ (प्रवासाची विविध साधने जोडणे) आणि समान तिकीट प्रणालीचा अजूनही पूर्णपणे मेळ बसलेला नाही. यामुळे प्रवाशांना एका वाहनातून दुसर्या वाहनात प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतो.
मुख्य त्रुटी : मेट्रो स्टेशनवरून अंतिम गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी मनपाच्या ‘आपली बस’ किंवा ई-रिक्षांचा वेळेवर मेळ बसत नाही. बस फेर्या अनिश्चित असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. समान तिकीट प्रणालीचा अभाव : दोन्ही सेवांसाठी स्वतंत्र तिकीट किंवा पास काढावा लागतो. समान तिकीट प्रणाली (कॉमन मोबॅलिटी कार्ड) वापरल्यास प्रवाशांना सुटसुटीतपणे गंतव्यस्थानी जाता येऊ शकते. प्रवाशांना दोन्ही व्यवस्था जोडणारे एकच स्मार्ट कार्ड वापरण्याची सुविधा अजूनही सर्वसमावेशक नाही.
बस थांब्यांची दुर्दशा: मनपाच्या बस थांब्यांची ढासळलेली पायाभूत सुविधा आणि गैरसोयींमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. बस वेळापत्रकात स्पष्टता नसल्याने स्थानकांवर बराच वेळ ताटकळत थांबावे लागते.