श्रीनगर,
amarnath yatra temporarily suspended हवामान खात्याने खराब हवामानाचा इशारा दिल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोठे पाऊल उचलले आहे. यात्रेकरूंची सुरक्षा आणि सोय लक्षात घेत श्री अमरनाथ यात्रा १९ जुलैपासून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून तात्पुरती स्थगित केली आहे.
या निर्णयाबाबत माहिती देताना काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग शनिवारी म्हणाले, भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या कारणास्तव, रविवारपासून बालटाल आणि नुनवान/चंदनवाडी (पहलगाम) या दोन्ही बेस कॅम्पमधून कोणत्याही भाविकांना पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. ही स्थगिती सावधगिरीचा उपाय आहे़ जेणेकरून भाविकांना डोंगराळ रस्त्यावर हवामानाशी संबंधित कोणत्याही धोक्याचा सामना करावा लागू नये. हवामान स्वच्छ झाल्यानंतर आणि संपूर्ण यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.