मुंबई
the india story बहुप्रतीक्षित ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, कीटकनाशकांचा शेतीवर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर सामाजिक समस्यांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रभावी भूमिका असलेल्या या चित्रपटात समाजासमोरील एका दडलेल्या संकटाचे वास्तव मांडण्यात आले आहे.
‘स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या संकल्पनेवर आधारित असलेला हा चित्रपट लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या समस्येची जाणीव करून देतो. दमदार नाट्य, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशयाने परिपूर्ण असलेला ट्रेलर सत्य, न्याय आणि संघर्षाच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक दाखवतो.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने निर्मित ‘द इंडिया स्टोरी’चे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि निर्मितीची जबाबदारी सागर बी. शिंदे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शक चेतन डीके यांनी सांगितले की, “द इंडिया स्टोरी हा केवळ एक चित्रपट नाही, तर समाजाने गांभीर्याने घ्यावा असा महत्त्वाचा संवाद आहे. प्रत्येक घरावर शांतपणे परिणाम करणाऱ्या एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. ट्रेलर हा सत्य, धैर्य आणि जिद्दीच्या प्रवासाची केवळ एक झलक आहे. प्रेक्षकांनी या विषयावर विचार करावा, प्रश्न विचारावेत आणि वास्तव समजून घ्यावे, हीच आमची अपेक्षा आहे.”अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी या चित्रपटाचा भाग होणे आपल्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण अनुभव असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “‘द इंडिया स्टोरी’मधील माझी व्यक्तिरेखा सर्व अडचणींना सामोरे जात सत्यासाठी उभी राहते आणि हाच या चित्रपटाचा मुख्य आत्मा आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल आणि त्यांना हा प्रभावी चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता निर्माण करेल, अशी मला आशा आहे.”
अभिनेता श्रेयस तळपदे the india story यांनीही चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर या चित्रपटाचा भावनिक गाभा प्रभावीपणे समोर आणतो. एका सामान्य माणसाने आशा आणि जिद्दीच्या बळावर एका असामान्य आव्हानाविरोधात दिलेल्या लढ्याची ही कथा आहे. चित्रपटातील भावना आणि संदेश प्रत्येक प्रेक्षकाला आपलासा वाटेल. २४ जुलै रोजी प्रेक्षकांनी हा अनुभव चित्रपटगृहात घ्यावा, यासाठी मी उत्सुक आहे.”या चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून स्वाती विनायक सैंदाणे, अनीता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या तांत्रिक विभागात छायांकनाची जबाबदारी निशांत भागवत यांनी सांभाळली आहे. संगीत मंगेश धाकडे यांचे असून, संकलन आशीष म्हात्रे यांनी केले आहे. गीतकार म्हणून शकील आझमी आणि ध्वनी संयोजनासाठी अनमोल भावे यांनी योगदान दिले आहे.