तळेगाव (श्या.पं.)
bakli river आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी शहरात पूरस्थिती निर्माण झाली. गजानननगरी जलमय झाली असून नरसिंगपूर परिसरात पावसाचा कहर पाहायला मिळाला. विशेषतः नरसिंगपूर परिसरात पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पुरात १२ शेळ्या वाहून गेल्या. नरसिंगपूर येथील जिपच्या प्राथमिक शाळेत पाणी घुसल्याने नवीन पाठ्यपुस्तके व संपूर्ण रेकॉर्ड ओला झाला.

आष्टी येथे बुधवारी रात्री मुसळधार पाऊस आला. त्यामुळे बाकळी नदीला पूर आला. मात्र, पाटबंधारे प्रशासनाने यावर्षी गेट न उघडल्यामुळे नरसिंगपूर गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला. यात नरसिंगपूर येथील अनिकेत कोहरे यांच्या आठ शेळ्या वाहून गेल्या. तर चार शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. तसेच नरसिंगपूर जिप शाळेतील नवीन पुस्तके, शाळेचा रेकॉर्ड आणि धान्य ओले झाले. नदीवरील कोल्हापुरी बंधारा पाटबंधारे विभागाने वेळेवर साफ न केल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला आणि पूरस्थिती अधिकच बिकट झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळेला लागून असलेल्या राष्ट्रस़ंत तुकडोजी महाराज अभ्यासिकेत पाणी शिरल्यामुळे संपूर्ण पुस्तके ओले झाले. जुन्या बसस्थानकावरील रविंद्र निंबेकर यांच्या वेल्डिंग दुकानात आणि अंकुश शिरभाते यांच्या ईलेक्ट्रॉनिक दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तहसिलदार ऐश्वर्या गिरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले़ पूरस्थितीमुळे नरसिंगपूर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धोत्रे, तलाठी भारती चव्हाण, तलाठी हशीब शेख, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. डी. एस. पाटील, पर्यवेक्षक भालचंद्र जाणे, मुख्याध्यापक केशव चौरेवार, नपं अभियंता विवेक पाटील, स्वच्छता निरीक्षक रमेश चाफले उपस्थित होते.
धाडी अन् लहान आर्वीतही नुकसान
धाडी आणि लहान आर्वी येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहान आर्वी ग्रा.पं. कक्षेतील सुजातपूर येथे वनविभागाच्या नाल्यांचे पाणी शेतात आल्यामुळे रविंद्र हमाणे, राजेंद्र चरडे, गोपाल चरडे, संजय चरडे यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. तर धाडी येथे सुद्धा शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.