मुंबई
ram kapoor 'बडे अच्छे लगते है' फेम अभिनेता राम कपूर सध्या 'लॉकअप २' या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला आहे. शोमध्ये केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. गँगरेपसारख्या गंभीर विषयावर आधी विनोद केल्याप्रकरणी तो वादात सापडला होता. त्यानंतर विवाहबाह्य संबंधांबाबत केलेल्या विधानामुळेही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
'लॉकअप'च्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन कंगना राणौतने केले होते. तर दुसऱ्या पर्वात फराह खान आणि रितेश देशमुख हे सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात कंगना राणौतने विशेष उपस्थिती लावली. यावेळी तिने राम कपूरच्या वर्तनावर आणि भूमिकेवर थेट भाष्य करत त्याला चांगलेच सुनावले.
राम कपूरला उद्देशून कंगना म्हणाली, "राम जी, तुम्ही या खेळाला इतकंही गांभीर्याने घ्यायला नको होतं. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही या लॉकअपसाठी खूपच मोठे कलाकार आहात तर तुम्ही इकडे आलाच का? स्वत:चा मूर्खपणा दाखवायला?" यावर स्वतःची भूमिका स्पष्ट करत राम कपूर म्हणाला, "जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी माझा खरेपणा सर्वांसमोर आणेन आणि चांगल्या प्रकारे दाखवेन."
रामच्या या उत्तरानंतर कंगनाने त्याला पुन्हा इशारा देत म्हटले, "जर सुधरायचं असेल तर स्वत:चा बचाव करणं बंद करा."यापूर्वीही राम कपूरचा शोदरम्यान फराह खानसोबत वाद झाला होता. चार्जशीट सेगमेंटमध्ये फराहने त्याला स्पष्ट शब्दांत सुनावत म्हटले होते, "प्रत्येक शोमध्ये तू लीड रोलमध्ये दिसतोस, पण इथे येऊन तू बॅकग्राऊंड अभिनेता बनला आहेस. जो मी पाहतीये तो राम मला अजिबात आवडत नाहीये. हे गंमतीत घेऊ नकोस."फराहच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राम कपूर म्हणाला, "माझ्यासाठी तर ही गंमतच आहे. मी जसा आहे तसाच राहणार."