वाशिम,
ali beg mirza प्रत्येक वाहनधारकाचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठीच वाहतूक विषयक नियम व कायदे बनविले गेले आहेत. या नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून करावी, असे आवाहन महाराष्ट्र अॅटो रिक्षा मोटर्स टॅसी चालक कल्याणकारी मंडळाचे जिल्हा संचालक अली बेग अब्बास बेग मिर्झा यांनी केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वाशीम येथे शहरातील टॅसी चालक मालक यांना वाहातूक नियमाबाबत मेळावा मार्गदर्शन बैठक २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाली. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक उपप्रादेशीक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, साधना धुरमुले, शहर वाहातूक शाखाचे पो. नि. बाळासाहेब नाईक आणि आनंद दिघे यांची उपस्थिती होती.
यावेळी नव्यानेच पदभार घेतलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम मार्गदर्शन करतांना म्हणाले की, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवणे याबरोबर सुरक्षित वाहन चालविणे आवश्यक आहे. वाहन चालक लेन सोडून वाहने चालवतात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे ते म्हणाले. यावेळी पुढे बोलतांना अलीबेग मिर्झा म्हणाले की, प्रत्येक वाहन चालकांनी आपल्या वाहानाचे कागदपत्रे सोबत ठेवावे. टॅसी चालक मालक, वाहन चालकांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा. साधना भूरमुले यांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने वाहन मालक, चालकांची उपस्थिती होती.