संकटात भारताची मदत चीनच्या स्मरणात!

१२ चिनी कर्मचाऱ्यांच्या सुटकेचा केला उल्लेख

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
China remembers India's help during a crisis. केरळच्या किनाऱ्याजवळ गेल्या वर्षी जूनमध्ये आग लागून स्फोट झालेल्या मालवाहू जहाजातून १२ चिनी कर्मचाऱ्यांची भारतीय लष्कराने केलेली सुटका चीन कधीही विसरणार नाही, असे चीनचे भारतातील नवनियुक्त संरक्षण सहचारी रिअर ॲडमिरल यू जियान यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कराने संकटाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले.चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) स्थापनेच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात रिअर ॲडमिरल यू जियान बोलत होते. भारत आणि चीन हे एकमेकांचे महत्त्वाचे शेजारी देश असून, दोन्ही राष्ट्रे सध्या विकास आणि राष्ट्रीय पुनर्बांधणीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
China remembers India
 
 
दोन्ही देशांच्या नेत्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनामुळे भारत-चीन संबंध पुन्हा सुधारणा आणि विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचे यू जियान यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी केरळच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या घटनेचा विशेष उल्लेख केला. गेल्या जूनमध्ये आग लागून स्फोट झालेल्या मालवाहू जहाजातून भारतीय लष्कराने १२ चिनी कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली होती. भारतीय लष्कराची ही मदत चीन कधीही विसरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.भारतीय आणि चिनी सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, या मोहिमांमध्ये दोन्ही देशांच्या जवानांनी मोठे बलिदानही दिले आहे, असे यू जियान यांनी सांगितले. भारत आणि चीनमधील मतभेदांपेक्षा दोन्ही देशांचे समान हितसंबंध अधिक मोठे आणि महत्त्वाचे आहेत, असा चीनचा नेहमीच विश्वास राहिला आहे, असेही त्यांनी म्हटले. दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणखी वाढवण्याची चीनची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
भारतासोबत राजनैतिक तसेच लष्करी स्तरावर सातत्याने संवाद सुरू ठेवण्याची चीनची भूमिका असल्याचे यू जियान यांनी सांगितले. संवादाच्या माध्यमातून परस्पर विश्वास वाढवणे, सहकार्य मजबूत करणे आणि दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करणे, हे चीनचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.अलिकडच्या काळात भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये सातत्याने सकारात्मक प्रगती होत असल्याचेही यू जियान यांनी सांगितले. भारत आणि चीन हे अविभाज्य शेजारी असल्याचे चीनने अलीकडेच म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. नवी दिल्ली आणि बीजिंग यांच्यातील संबंध हळूहळू सामान्य करण्याच्या उद्देशाने सकारात्मक आणि रचनात्मक संवाद सुरू असल्याचे चित्र आहे.