मालेगाव,
congress protests दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याच्या विरोधात मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे मागील २२ दिवसापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला तसेच अश्रुधुराचा मारा करून दडपशाहीचे धोरण अवलंबण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा निषेधही निवेदनातून व्यक्त करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून, लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे व मत व्यक्त करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाचा सन्मान करून त्यांच्या मागण्यावर सकारात्मक तोडगा काढावा तसेच आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.