गडचिरोली,
shutdown-in-gadchiroli : दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज गुरुवारी,23 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा बंद पाळण्यात आला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात आंदोलन मोठ्या स्वरूपात होऊ शकते, हे लक्षात घेत इंदीरा गांधी चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी 10.30 वाजता शहरातील अनेक शाळांनी सुट्टी दिली होती. शहरातील बुहतांश दुकाने बंद होती. विशेष म्हणजे अनेक मोठ्या प्रतिष्ठानधारकांनीही स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. स्थानिक इंदिरा गांधी चौकात निदर्शने, आंदोलने करण्यात आली. जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध राजकीय पक्षांनी आंदोलनात सहभाग घेतला.
वंचितचे पूर्व विदर्भ समन्वयक तथा नगरसेवक बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे, निरीक्षक जी के बारसिंगे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बंसोड, शिवसेना (उबाठा)चे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, संघटक नंदू कुमरे, आझाद समाज पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, माकपचे देवराव चवळे, शेकापचे रामदास जराते, जयश्री वेळदा, वंचित महिला आघाडीच्या सीमा खोब्रागडे, निलीमा दुधे, विलास केळझरकर, कवडू दुधे, प्रतिक डांगे, प्रितेश अंबादे आदी विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते व स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी बंदच्या आंदोलनात सहभागी झाले होते.
चामोर्शीसह आष्टी,अहेरी, आलापल्ली येथेसुद्धा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. आष्टी येथील बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, आझाद समाज पक्ष, विद्यार्थी संघटना, महिला आघाडी आदींनी आष्टी शहरात कडकडीत बंद पुकारला. सकाळी 9 वाजतापासून सर्व दुकाने, चहा टपरी , स्वीट मार् , किराणा, फळविक्रेते, पानठेले पूर्णपणे बंद होते. तसेच शाळा, कॉन्व्हेन्ट, महाविद्यालयेसुद्धा बंद ठेवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने देण्यात आली. याप्रसंगी शंकर मारशेट्टीवार, माजी पंचायत समिती सदस्य शंकर आक्रेडीवार, दिलीप बारसागडे, पंकज पसपुलवार, ग्रामपंचायत सदस्य छोटू दुर्गे, सूरज सोयाम, देवा बोरकुटे, संदीप तिवाडे, निशिकांत भसारकर, अमित नगराळे, पवन कुकुडकर, माजी उपसरपंच अनिल गोंगले, महेंद्र खोब्रागडे आदी उपस्थित होते. अहेरी तालुक्यातील आलापल्ली परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. विशेष म्हणजे, आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात नागरिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर चौकातून रॅली काढत नागरिक रस्त्यावर उतरले. निदर्शनांनंतर आंदोलनकर्त्यांनी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बारगे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादरद केले. या आंदोलनाच्या श्ष्ठभूमीवर सकाळपासूनच अहेरीचे ठाणेदार हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय जिल्ह्याच्या इतर भागांतही बंदला कुठे उत्स्फूर्त, तर कुठे संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
देसाईगंज येथे आज रास्ता रोको...
पेपर फुटीप्रकरणी न्यायाची मागणी करत दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात शुक्रवार आज 24 दुपारी 2.30 वाजता कुरखेडा टी-पॉईंट, रेल्वे बोगद्याजवळ, देसाईगंज (वडसा) येथे रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व नागरिक, युवक, विद्यार्थी, सामाजिक संघटना तसेच सर्वपक्षीय लोकशाहीवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन न्यायाच्या लढ्याला आपला खंबीर पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार रामदास मसराम यांनी केले आहे.