मुंबई
salman khan NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली 20 जुलै रोजी संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला. या घटनेनंतर अनेक चित्रपट कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून, मुंबईत झालेल्या आंदोलनातही अनेक कलाकार सहभागी झाले. आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
सलमान खानने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त केले. तो म्हणाला, “हे आंदोलन अतिशय शांततापूर्ण होते. त्याला हिंसक वळण लागल्याचे पाहून मला खूप दुःख झाले. या आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय आहे. आपल्या देशातील विद्यार्थी अधिक चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आले आहेत आणि त्यांच्या पालकांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे, ही आनंदाची बाब आहे.”
विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे कौतुक करत सलमानने पुढे म्हटले, “विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांनी अभ्यासाविषयीची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची जिद्द दाखवली आहे. हे आंदोलन योग्य दिशेने सुरू आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केले आहे. त्यांचे धैर्य आणि साहस प्रेरणादायी आहे. शिक्षणासाठीची त्यांची तळमळ आणि प्रेरणा पाहता, ही पिढी भारताचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल.”
सरकारने विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली. “हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेतील आहे. याला राजकीय रंग देऊ नये. या आंदोलनाचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच मिळायला हवे. मला विश्वास आहे की सरकार विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करेल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल. त्यामुळे सर्वांसाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी माझी अपेक्षा आणि प्रार्थना आहे. शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला देव आशीर्वाद देवो,” असे सलमानने नमूद केले.
पोस्टच्या शेवटी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सलमान खान म्हणाला, “शिक्षण हा पुढचा ट्रेंड आणि फॅशन बनला पाहिजे. वर्षागणिक ते अधिक लोकप्रिय आणि आकर्षक व्हावे, इतके की परदेशातील विद्यार्थीही शिक्षणासाठी भारतात यावेत आणि भारत जगातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखला जावा.”