दिल्ली
abhijeet dipke दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपी कडून करण्यात आली होती. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आंदोलनाला यश मिळाल्याचे सीजेपीने म्हटले आहे.
NEET पेपर लीक प्रकरणावरून सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान, “काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही,” अशी भूमिका CJPने घेतली होती. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन संपुष्टात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केले की, दिल्लीतील आंदोलन अद्याप सुरूच राहणार आहे.
दीपके यांनी पुढे म्हटले की, केवळ राजीनामा झाला म्हणून आंदोलन थांबणार नाही. “आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.सीजेपीच्या प्रमुख मागण्यांमध्ये NEET आणि इतर परीक्षांमधील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, आंदोलनादरम्यान तरुणांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.