अयोध्या,
ram mandir उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिरात देणगी अपहार आरोपांनंतर सुरू झालेला १० दिवसांचा प्रायश्चित्त आणि शुद्धीकरणाचा विधी, शुक्रवारी संध्याकाळी ‘पूर्णाहुती’ने (अर्पण विधी) समाप्त झाला, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त महंत दिनेंद्र दास यांनी दिली. हा विधी १५ जुलै रोजी सुरू झाला होता आणि त्याचे आयोजन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केले होते.
धार्मिक विधींच्या माध्यमातून मंदिर परिसराची पवित्रता पुनर्स्थापित करणे हा यामागील उद्देश होता, असे ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विधीच्या अंतिम दिवशी मंदिराच्या यज्ञशाळेत हवन आणि विशेष पूजा करण्यात आली. संपूर्ण सोहळा वैदिक विद्वानांच्या देखरेखीखाली पार पडला, असे महंत दिनेंद्र दास यांनी शनिवारी सांगितले. विश्वस्त महंत दिनेंद्र दास आणि विश्वस्त कृष्ण मोहन यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला आणि आहुती अर्पण केली. स्थानिक ब्राह्मणांना भोजन देऊन सामुदायिक मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते. अयोध्या आणि इतर ठिकाणचे सुमारे ७० वैदिक आचार्य या १० दिवसीय विधीमध्ये सहभागी झाले होते. आचार्यांनी वैदिक मंत्रोच्चार, हवन, रुद्राभिषेक आणि रामारछा पूजा केली. रामलल्लाच्या मुख्य पुजाऱ्याने संपूर्ण विधीभर विष्णू सहस्रनामाचे पठण केले. हा विधी ट्रस्टचे खजिनदार, स्वामी गोविंद देव गिरी यांच्या निर्देशानुसार पार पाडण्यात आला.
अपहार किंवा पूजेतील इतर व्यत्ययांसारख्या घटनांनंतर मंदिराची पवित्रता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी धार्मिक परंपरेनुसार हा विधी केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या आदेशानुसार एसआयटी आणि फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून, तपास अजूनही सुरू आहे.