पातुर,
agikhed gram panchayat पातूर पंचायत समिती अंतर्गत आगीखेड ग्राम पंचायतीचे सरपंच गजानन काशीराम टप्पे यांना ग्राम पंचायतीच्या मासिक सभा नियमित न घेतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम ३६ अन्वये अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, ग्रामस्थांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२३ मधील मार्च ते जून या कालावधीत ग्राम पंचायतीच्या मासिक सभा घेण्यात आल्या नसल्याचा आरोप सुभाष समाधान आवचार यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या याचिकेत केला होता. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून चौकशी केली. चौकशीत तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने सरपंच गजानन टप्पे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
या निर्णयानंतर ग्रामपंचायत प्रशासनातील जबाबदारी, पारदर्शकता आणि कायद्याचे पालन याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राम पंचायतीचे कामकाज नियमानुसार होण्यासाठी मासिक सभा नियमित होणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.