अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी असेल तरच होणार कर्जमुक्ती

*ग्रामपंचायत, तहसीलमध्ये पात्र शेतकर्‍यांच्या याद्या लागणार

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
वडनेर, 
agristack-registration : कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या नावाची पहिली यादी शासनाकडून पूर्ण झालेली असून ग्रामपंचायत तहसील कार्यालयामध्ये यादी प्रसिद्ध होणार आहेत, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी असेल तरच कर्जमुक्तीला शेतकरी पात्र ठरणार आहे.
 

JLK 
 
 
 
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचे अंकेक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीला पात्र शेतकर्‍यांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. राज्य शासनाने या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी प्रारंभ पात्र शेतकर्‍यांच्या नावाची पहिली यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
 
 
संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी यादी गावांमधील ग्रामपंचायत, बँका, सहकारी सोसायटी, सहाय्यक निबंधक कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आलेले आहे. त्यानुसार शेतकर्‍यांच्या याद्या या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत. यात प्रत्येक शेतकर्‍यांच्या नावापुढे विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. हा विशिष्ट क्रमांक घेऊन शेतकर्‍यांना सीएससी सेंटर अथवा सेतू केंद्रात जाता येणार आहे. या ठिकाणी शेतकर्‍यांना थंब द्यावा लागणार आहे. त्यानंतर रकम शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात जमा होईल.
 
 
कर्जमुक्ती यादीतील शेतकर्‍यांच्या नावात आणि आधार मधील शेतकर्‍यांच्या नावात तफावत असेल तर पोर्टलवर शेतकर्‍यांना त्यासाठी तक्रार सुद्धा नोंदविता येणार आहे. यामुळे कर्जमुक्ती यादीतील गुंता सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय कर्जमुक्ती शेतकर्‍याचा मृत्यू झाला असेल तर शेतकर्‍याच्या वारसाला मृत्यू प्रमाणपत्र बँकेत सादर करावे लागणार आहे. यानंतर बँक या प्रकरणी शेतकर्‍यांच्या वारसाची केवायसी केल्यानंतरच वारसाला कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.