नवी दिल्ली,
Junaid Bhai's court case जंतर-मंतर येथे सीजेपीच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांसाठी अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या मोहम्मद जुनैद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांकडून स्वतःचा तसेच कुटुंबीयांचा सातत्याने छळ होत असल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.याचिकेनुसार, पोलिसांनी जुनैद यांना दिल्लीतून ताब्यात घेतल्यानंतर सुमारे चार ते पाच तासांनी हरिद्वारजवळ सोडले. या काळात त्यांना धमकावण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वडिलांसह बहिणीच्या सासरच्या नातेवाईकांनाही पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान मोहम्मद जुनैद हे अनेक दिवस सार्वजनिकरित्या समोर आले नव्हते. ते पडद्यामागे राहून आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत होते. मात्र आंदोलन पुढे जात असताना 'जुनैद भाई' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि ते या आंदोलनातील परिचित चेहरा बनले. गाझियाबादमधील नहल गावचे रहिवासी असलेल्या जुनैद यांनी आंदोलनात कोणतेही अधिकृत पद भूषवले नव्हते. आंदोलकांसाठी अन्न व निवासाची व्यवस्था करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी होती. पोलिसांनी त्यांच्या घरी झडती घेतल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांच्या वडिलांना पोलीस ठाण्यात नेले आणि बँक पासबुक, पॅन कार्डसह विविध कागदपत्रे जप्त केली.
दरम्यान, मीरतमधील नातेवाईकांनाही पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र मीरत पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत, जुनैद यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आलेले नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही नोंद आढळली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.