वर्धा,
animals loose on the road जनावरांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे वाहतूक प्रभावित होऊन अनेकदा अपघात होतात. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांचीही तारांबळ उडते. पोलिसांना जनावरांना रस्त्यावरून पांगवावे लागत असल्याने पोलिस विभागाने आता सक्तीचे पाऊल उचलले आहे. पशुपालकांनी जनावरांना आवर न घातल्यास कायदेशीर कारवाई करीत पशुपालकांवर गुन्हे दाखल करून जनावरांना कोंडवाड्यात टाकू, तसेच मालकांनाही दंड भरावा लागणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिला आहे.
पशुपालकांवर गुन्हा दाखल करून जनावरांसंबंधी निष्काळजीपणा करणे व नुकसानीस कारणीभूत ठरवून ६ महिने कारावास किंवा ५ हजार रुपये दंड, रस्ता अडविल्याबद्दल शिक्षा किंवा ५ हजार रुपये दंड, जीवाला धोका निर्माण करणे याबाबत सहा महिन्यांचा कारावास किंवा १० हजारांचा दंड, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे यासाठी ५०० ते १५०० रुपयांचा दंड तसेच मोकाट जनावरांना कोंडवाड्यात जमा करून मालकाकडून जनावरांच्या देखभालीकरिता लागणारा खर्च व दंड वसूल करू, असा इशाराही वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिला आहे.