वाशीम,
Collector Yogesh Kumbhekar शेती आणि शेतकर्यांचा विकास हा केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून नसून प्रशासन व शेतकरी यांनी उत्कृष्ट समन्वय साधून एकत्रितपणे काम केल्यासच कृषी क्षेत्रात शाश्वत प्रगती साधता येईल. आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण शेती पद्धती आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
कृषी विभाग, जिल्हा परिषद वाशीम यांच्या वतीने १ जुलै रोजी कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान होते.अध्यक्षीय समारोपात मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी कै. वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी विकासासाठी दिलेल्या दूरदृष्टीपूर्ण योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शासनाच्या विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने अधिक समन्वयाने कार्य करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती पद्धतींच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विकासाला अधिक गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.