पावसाने वाढले कोल्हा'पुराचे' संकट!

नद्यांना पूर, बंधारे जलमय

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
कोल्हापूर,
Kolhapur's barrages filled with water कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच महत्त्वाचे बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. इचलकरंजी, रुई, शिंगणापूर, यवलूज आणि शिरोळ येथील बंधाऱ्यांवर पाणी आल्याने या मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची ये-जा होत असते. मात्र, पाण्याचा वेग वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
 
 
 
Kolhapur rain
 
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने या मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद केली असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.कोल्हापूर शहरात अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्या तरी जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. परिणामी पंचगंगा आणि इतर नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
आज सकाळी कोल्हापूर शहराजवळील राजाराम बंधाऱ्यावरही पाणी आल्याने तो पूर्णपणे पाण्याखाली गेला. धोका असूनही काही दुचाकीस्वार पाण्यातूनच बंधारा पार करण्याचा प्रयत्न करताना दिसले. वाहत्या पाण्याचा वेग लक्षात घेता हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, शिंगणापूर बंधाऱ्यावरही आज सकाळपासून पाणी आल्याने तो पाण्याखाली गेला आहे. तरीही काही नागरिक पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर मानत पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवून वाहतूक पूर्णपणे बंद केली. हवामान विभागाने पुढील काही तासांतही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून किंवा पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.