वेध,
lohagad-fort : प्रश्न किल्ल्याचा नाही, समाजाच्या ढासळत्या मूल्यांचा आहे. लोहगड बदनाम झाला कशासाठी आणि कोणासाठी तर तो तुमच्या आमच्या ढासळत्या मानसीकतेने! सह्याद्रीच्या कुशीत शतकानुशतके ताठ उभा असलेला लोहगड कित्येक राजवटी पाहून गेला. युद्धं पाहिली, पराक्रम पाहिले, विश्वासघातही पाहिले. हजारो पर्यटक त्याच्या पायऱ्या चढले, इतिहास अनुभवला, निसर्गात रमले. पण, तोच लोहगड एका धक्कादायक घटनेमुळे, विकृत मानसिकतेने चर्चेत आला. समाजमाध्यमांवर काही तासांत लाखो प्रतिक्रिया उमटल्या. किल्ला बदनाम झाला. पण, खरेच बदनाम कोण झाले? लोहगड की समाज? ती घटनाच गंभीर होती. त्याचे गांभीर्य ठेवण्याऐवजी हा ‘सुशिक्षीत समाज’ त्यावर उपरोधीक जोक करतात. तरुण पिढी मिम तयार करण्यात दंग झाली आहे. शौर्यासाठी प्रसिद्ध ठरलेला लोहगड आता खुनाच्या क्रौर्यासाठी ओळखल्या जातो आहे. आपण त्या खुनाकडेही कौतुकाने बघतो आहे. ज्या ठिकाणी एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा खुन केला. ते ठिकाण आता प्रेक्षणीय स्थळ होते आहे. ज्या लोहगडावर दिवसाला 700 ते 800 पर्यटक येत होते. त्या ठिकाणी आता दोन अडीच हजार पर्यटक भेट देऊ लागले.
अगदी, दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथील पर्यटकांनी ते घटनास्थळ बघितले. त्या दुदैवी जागेचे बारसेही करण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. कुठे जात आहोत आपण? घटना कोणतीही असो, ती एखाद्या ठिकाणाशी जोडली जाते आणि मग त्या ठिकाणाची ओळखच बदलते. लोहगड हा केवळ एक प्रतीक आहे. बदनाम झाली आहे ती आपली सामाजिक मानसिकता! गेल्या दोन दशकांत आपल्या विवाहसंस्कृतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी विवाह म्हणजे दोन व्यक्तींसोबत दोन कुटुंबांचे, दोन संस्कारांचे आणि दोन परंपरांचे मिलन मानले जायचे. विवाह हा केवळ प्रेमाचा नव्हे तर जबाबदारीचा आणि आयुष्यभराच्या बांधिलकीचा संस्कार होता. आज अनेक ठिकाणी विवाह ‘इव्हेंट’ झाला आहे. त्यातून संस्कार कधीचेच उडून गेले आहेत. आजचा तरुण आणि तरुणी अधिक शिक्षित आहेत, आर्थिक सक्षम आहेत. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही त्यांच्याकडे आहे. ते स्वागतार्ह असले तरी आपण आपली जबाबदारी विसरत आहोत. माझे आयुष्य, माझी मर्जी इथपर्यंतच आपण मर्यादीत झालो आहोत. प्रत्येक निर्णयाचा परिणाम कुटुंबावर, मुलांवर, समाजावर आणि शेवटी स्वतःवरही होतो, हे समजावून सांगणारी पिढीही आता वृद्धावस्थेकडे सरकते आहे. दुसरीकडे समाजमाध्यमांच्या वेगात वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक होऊ लागले आहे. नातेसंबंधांचे प्रदर्शन वाढले. पण, नात्यांचा गाभा कमी झाला. प्रेम व्यक्त करण्याची साधने वाढली.
प्रेम टिकवण्याची क्षमता मात्र कमी होऊ लागली. आज अनेक तरुण-तरुणी भावनिकदृष्ट्या एकाकी आहेत. मित्रांची संख्या फेसबूक व व्हॉटॲपवर हजारोत आहे. पण, मन मोकळे करण्यासाठी कोणीच नाही अशी परिस्थिती झाली आहे. संयुक्त कुटुंब पद्धती हळूहळू कमी झाली. घरात रागावणारे, समजावणारे, सांभाळणारे नाहीत. आई-वडील दोघेही नोकरीत, मुलांना वेळ कमी दिल्या जात असल्याने संवाद कमी झाला. घरात कोंडून असलेल्या मुलांच्या संस्कारांची जागा मोबाइलने घेतली. पालकांनी मुलांना उत्तम शिक्षण दिले. महागडे फोन दिले. पण, आयुष्य जगण्याचे शिक्षण कितपत दिले? अपयश स्वीकारायला शिकवले का? नाती टिकवायला शिकवले का? रागावर नियंत्रण ठेवायला शिकवले का? तर या प्रश्नांचे उत्तर नकारार्थीच मिळते. शिक्षण व्यवस्थेत मूल्यांऐवजी गुणांना महत्त्व. न्याय व्यवस्थेकडे समाज मोठ्या अपेक्षेने पाहतो. गुन्हा घडल्यानंतर कठोर शिक्षा व्हावी, ही अपेक्षा योग्यच आहे. पण, न्याय केवळ शिक्षेपुरता मर्यादित नसतो. गुन्हे घडू नयेत, अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. कायद्याची भीती आणि समाजाचे भान या दोन्ही गोष्टी एकत्र असल्या तरच गुन्हे कमी होतील आणि लोहगडावर घडलेल्या घटना आपोआप कमी झालेल्या दिसतील. आज लोहगडवर झालेल्या घटनेत आणि त्यानंतर त्याचे जे कवित्व सुरू आहे त्यातून आपण आपल्या पुढच्या पिढीला नेमके काय देतो आहोत? कालची घटना नजरेआड करून नक्कीच चालणार नाही. त्या घटनेने एक संदेश दिला आहे. या घटनेने लोहगडाचे महत्त्व कचितही कमी होणार नाही.
लोहगड इतिहासासाठीच ओळखला जात होता आणि जाईलही. त्याच्या तटबंदीवर पुन्हा पर्यटक जातील, फोटो काढतील, इतिहास आठवतील. पण, काल परवा झालेल्या घटनेतून आपण काही शिकलो नाही, तर उद्या दुसरा एखादा किल्ला, दुसरे एखादे शहर, दुसरे एखादे गाव अशाच कारणाने बदनाम होईल. एका मुलीने होणाऱ्या नवऱ्याला धकलून दिल्याने लोहगड नव्हे तर आपली मानसिकता बदनाम झाली. सामाजिक मूल्य पायदळी तुडवल्या जात आहेत. त्या किल्याचे दगड अजूनही मजबूत आहेत. कमकुवत आपण झालो. घटनेचे गांभीर्य विसरून त्यावर विनोद सुचत आहेत. आज प्रश्न लोहगडचा नाही आपल्या मुलांचा आहे, आपल्या संस्कारांचा आहे आणि उद्याच्या पिढीचा आहे. समाज बदलण्याची पहिली शाळा अजूनही कुटुंबच आहे हे विसरून चालणार आहे. लोहगडाला बदनाम करणे थांबवा त्याचा इतिहास कायम ठेवा. पर्यटकांना लोहगडावर इतिहास जाणून घ्यायला येऊ द्या... इतिहासात शस्त्रुला टकमकच्या टोकाहुन कडेलोट करून शिक्षा दिल्या जात होती. पण, तो आमचा इतिहास होता. तसाच इतिहास कायम ठेवा. त्याला एका घटनेने विकृत करू नका... लोहगडाला प्रेम प्रकरणातील खुनाच्या जोखाडात अडकून ठेऊ नका.
प्रफुल्ल व्यास
9881903765