monsoon health tips पावसाळा सुरू होताच वातावरणात गारवा आणि आर्द्रता वाढते. हा ऋतू जितका आनंददायी वाटतो, तितकाच आरोग्यासाठी संवेदनशीलही मानला जातो. या काळात संसर्गजन्य आजार, सर्दी-खोकला, ताप आणि पचनाशी संबंधित तक्रारी वाढण्याची शक्यता अधिक असते. आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक ठरते.
डॉ. चंचल शर्मा यांच्या मते, पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी काही खास पदार्थ आणि सवयी दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे गरजेचे आहे. आर्द्रता आणि थंड हवेमुळे वात वाढल्यास सांधेदुखी, अंगदुखी आणि थकवा जाणवू शकतो. त्याचवेळी पित्त वाढल्यास आम्लपित्त आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास संभवतो. वाढलेल्या कफमुळे सर्दी, खोकला आणि कफाच्या समस्या उद्भवू शकतात.
अशा परिस्थितीत हळदीचे दूध हा उत्तम पर्याय मानला जातो. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि औषधी गुणधर्म शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी मदत करतात. कोमट दुधात हळद मिसळून सेवन केल्यास सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळू शकते. आवळा देखील पावसाळ्यात अत्यंत फायदेशीर ठरतो. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो आणि संसर्गाचा धोका कमी करतो. याशिवाय च्यवनप्राश चे नियमित सेवन शरीराला ऊर्जा आणि ताकद देण्यास उपयुक्त ठरते.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात थंड पाणी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याऐवजी कोमट किंवा गरम पाणी पिणे अधिक लाभदायक ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात उष्णता संतुलित राहते. यासोबतच अति व्यायाम टाळून हलक्या स्वरूपाचा व्यायाम किंवा योगाचा अवलंब करावा. प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम आणि काही योगासने शरीर सक्रिय ठेवण्यास तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. पावसाळ्यात आहार आणि दिनचर्येत छोटे बदल केल्यास आजारांपासून बचाव करत हा ऋतू निरोगीपणे अनुभवता येऊ शकतो.
अस्वीकरण: (या लेखात सुचवलेल्या सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. कोणताही फिटनेस कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, आहारात बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजारासाठी उपाययोजना करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तरुण भारत कोणत्याही दाव्यांच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.)