ठाणे
bridge truck accident ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक आधीच मंदावलेली असताना कासारवडवली परिसरातून अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. गजबजलेल्या कासारवडवली पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलाची सुरक्षा भिंत आणि डिव्हायडर तोडून अर्धा भाग पुलावर आणि अर्धा भाग हवेत लटकलेल्या अवस्थेत अडकला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पावसामुळे रस्ता ओला आणि घसरडा असल्याने तसेच ट्रकचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर ट्रक थेट डिव्हायडरला जोरदार धडकला आणि ही धडक इतकी भीषण होती की पुलाची मजबूत सुरक्षा भिंतही तुटून पडली. खाली खोल रस्ता आणि वर अधांतरी लटकलेला ट्रक पाहून त्या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांचे काळजाचे ठोके चुकल्याची स्थिती निर्माण झाली.
या अपघातात सुदैवाने bridge truck accident अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, ट्रक खाली कोसळला असता तर खालील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर तो आदळून मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. सुदैवाने निसर्ग आणि परिस्थितीच्या योगायोगामुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, अर्धा ट्रक पुलावर अडकलेला असताना आणि अर्धा भाग हवेत लटकलेल्या अवस्थेत असल्याने तो अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या अपघातामुळे तसेच सुरू असलेल्या बचावकार्यामुळे कासारवडवली पुल परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.सततच्या पावसामुळे आधीच ठाण्यातील वाहतूक विस्कळीत झालेली असताना या घटनेने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. पुल आणि उड्डाणपुलांवरून वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा, अचानक ब्रेक दाबू नये, अन्यथा अशा अपघातांचा धोका वाढतो, असा इशाराही या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केला जात आहे.