इस्लामाबाद,
we will fight until our last breath व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविराेधात ५ जुलैला मोठ्या आंदोलनाची घाेषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान रेंजर्स आणि पोलिसांनी व्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवर मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करत असताना ही घाेषणा करण्यात आली आहे़ बलुचिस्तानमधील दडपशाहीप्रमाणेच व्याप्त काश्मीरमधील आंदोलकांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतले जात असून त्यांना जबरदस्तीने गायब केले जात आहे, असा आराेप या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आवामी ॲक्शन कमिटीने केला आहे़. आवामी ॲक्शन कमिटीचे सदस्य शौकत नवाज मीर यांना अटक करुन त्यांना सक्तीने गायब केल्यामुळे व्याप्त काश्मीरमध्ये तणावाचे वातावरणा आहे़ आंदोलनाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, मीर यांच्या गायब केल्यामुळे संपूर्ण प्रदेशात लोकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे त्यांच्या तात्काळ सुटकेच्या मागणीसाठी पुन्हा तीव्र आंदोलने सुरू झाली आहेत.

गुरुवारी रात्री उशिरा रावलकोटमध्ये आणखी एका आंदोलनासाठी शेकडो लोक जमले होते. सभेला संबोधित करताना जम्मू आणि काश्मीर अवामी ॲक्शन कमिटीचे नेते आणि वकील ख्वाजा मेहरान यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर थेट हल्ला चढवला आणि शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी अटकसत्र व धमक्या दिल्याचा आरोप केला. पाकिस्तानच्या दडपशाहीपुढे झुकण्यास नकार देत मेहरान म्हणाले, आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढू. पाकिस्तानी सैन्याकडून दडपशाही होत असूनही आंदोलन शांततापूर्ण राहील, यावरही त्यांनी जोर दिला. आधीच बलुचिस्तानात तेथील नागरिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत असताना व्याप्त काश्मिरातही जनता रस्तावर उतरल्याने पाकिस्तानची पुरती कोंडी झालीी आहे. एकीकडे जम्मू-काश्मीरमधील जनता सुखाचे आणि समाधानाचे जीवन जगत असताना व्याप्त भागातील नागरिकांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. पायाभूत सुविधांची वानवा असताना महागाईने नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने गव्हाचे पीठ, तेल, साखर आदी दररोजच्या वापरातील वस्तूही विकत घेणे काठीण झाल्याने जनतेला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
काश्मिरी महिलांविरुद्धही एफआयआर दाखल
काही दिवसांपासून रावलकोट हे पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांचे केंद्र बनले आहे. गत महिन्यात पाकिस्तानी रेंजर्सनी येथील आंदोलकांच्या एका गटावर गोळीबार केला होता, ज्यात अनेक जण ठार झाले. त्यामुळे लाेकामध्ये सरकार आणि लष्कराविराेधात असंताेष पसरला आहे़ पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केवळ आंदोलनाच्या आयोजकांविरुद्धच नव्हे, तर आंदोलनात सहभागी झालेल्या काश्मिरी महिलांविरुद्धही एफआयआर दाखल केले, असा आराेप ख्वाजा मेहरान यांनी केला आहे़