नाशिक
nashik pothole accident नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एका नागरिकाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. एक्सलो पॉईंट परिसरात खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात निलेश कोतकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत अशा दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी जोर धरत आहे.याआधी खड्डयांमुळे अंबड लिंक रोडवर प्रभाकर निकम, जूनमध्ये श्रमिकनगर येथील प्रवीण गायकवाड, जुलैमध्ये मेरी येथील दीपाली बेळे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यात आता नीलेश कोतकर यांची भर पडली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथे पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले.शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर विशेष महासभा घेण्याऐवजी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्यांची स्थिती सुधारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.