सिंदी (रेल्वे)
railway safety concerns रेल्वे प्रशासनाने नजीकच्या तुळजापूर रेल्वे स्थानकावर अनेकांचे जीव गेले. पण, वाहतुकीची कोंडी फुटली नाही! अजून किती बळी गेल्यावर प्रशासन गावकर्यांच्या समस्यांची उकल करणार आहे, असा सवाल गावकर्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषद सर्कलमधील दहेगाव हे सर्वात मोठे गाव आहे. परिसरातील नागरिकांसाठी ही मोठी बाजारपेठ आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे आदींची सोय आहे. या गावाच्या मध्यभागातून रेल्वे लाईन गेल्यामुळे दुर्दैवाने दोन वस्त्यात विभागणी झाली आहे. दर बुधवारी येथे आठवडी बाजार भरतो. पण, ग्राहकांना आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागते. रेल्वे प्रशासनाने पदपथ तयार करण्याची घोषणा करुन पाच वर्ष झाली. परंतु, पुलाचे काम तसेच फलाटाचे काम कासवगतीने सुरू आहे.जनतेसाठी प्रशासनाने गावाच्या पश्चिम दिशेला पुलाखालून वाहतुकीची सोय केली आहे. परंतु, तेथे कायम अंधार असतो. शिवाय पावसाळ्यात पाणी साचलेले असते. त्यामुळे नागरिक जोखीम पत्करुन रेल्वे रुळ ओलांडणे पसंद करतात. फलाटावर मालगाडी आडवी असेल तर अंदाज फसतो आणि जिवितहानीला सामोरे जावे लागते. या नादात गत दहा वर्षांत किमान १५-१६ जणांचे बळी गेले आहेत. पण, निष्ठूर रेल्वे प्रशासन ढिम्म आहे.फलाटांची उंची वाढवणे, फलाटावर पाण्याची सोय करणे आणि ओव्हर ब्रिज बांधण्यास सरकारने अविलंब गती द्यावी, अशी मागणी दहेगावसह परिसरातील ३० गावातील नागरिकांनी केली आहे.