आजनसरा,
yashoda-river-overflowing : गेल्या २ दिवसांपासून टाकळी(निधा) परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याने टाकळी गावाला चहूबाजूंनी वेढा घातला असून संपूर्ण गाव पाण्यात सापडले आहे. गुरुवारपासून टाकळी-निधा-सिरसगाव या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरून नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याने गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.
पुराच्या पाण्याने अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत. हातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. टाकळी गावातील शेतकर्यांनी प्रशासनाकडे प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
आम्ही वेळेवर पीक विमा भरला आहे. पण पंचनाम्याच्या नावाखाली दिरंगाई होऊ नये. नुकसान १०० टक्के झाले आहे. त्यामुळे तात्काळ सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.