भंडारा
gosekhurd गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलसाठ्यात अचानक झालेल्या वाढीमुळे पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे प्रकल्पातून 3706 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी वैनगंगा खोऱ्यातील नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
gosekhurd दरवर्षी पावसाळ्यात वैनगंगेला पूर येतो. मात्र यात सिंहाचा वाटा असतो तो पर राज्यातील प्रकल्पांमधून सोडवण्यात आलेल्या पाण्याचा आणि शेजारच्या गोंदिया जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा. मागील तीन ते चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. मात्र वैनगंगेच्या पातळीत वाढ व्हावी, एवढी तीव्रता त्याची नाही. तरीही आज गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून 3706 क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा परिणाम गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुढील भागातील वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढण्यावर होत आहे. नदी काठावरील गावांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
gosekhurd वैनगंगा नदीत मध्य प्रदेशातील पुजारीटोला, संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा प्रकल्पाचे पाणी जलसाठा नियंत्रित करण्याच्या दृष्टीने सोडले जाते. या पाण्यामुळे सध्या वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढून गोसेखुर्दचा जलसाठा वाढला आहे.
गोसीखुर्दचे सर्व दरवाजे उघडल्याने पावसाळी पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी ही पर्वणी असेच म्हणता येईल.