रस्ते सुरक्षा हे जनआंदोलन व्हावे

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
road safety अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी चांगले रस्ते बांधणे पुरेसे नाही तर लोकांच्या वागणुकीत बदल झाला पाहिजे, तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणेही आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. उबेर सुरक्षा दिनानिमित्त ‘उबर सुरक्षित : सुरक्षा कधी थांबत नाही’, च्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. उबर इंडियाचे दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजितसिंग आणि सुरक्षा परिचालन प्रमुख सुरज नायर यावेळी उपस्थित होते. महामार्गावरील सुरक्षा ही सरकार, खाजगी कंपन्या तसेच लोकांची सामूहिक जबाबदारी आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, सुरक्षित वाहन चालवण्याची सवय सर्वांनी लावून घेतली पाहिजे, त्यासाठी वाहतूक नियमांचे कटाक्षाने पालन केले पाहिजे. रस्त्यावरील सुरक्षा हे जनआंदोलन झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
nitinji
 
काही कारणांमुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीत उबेरवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली, त्यावेळी या मागणीला गडकरी यांनी विरोध केला होता, याचा उल्लेख करत गडकरी म्हणाले की, पूर्ण कंपनीवर बंदी घालणे हे कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही. त्याऐवजी यंत्रणेत सुधारणा करणे तसेच नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरणे हे उपाय परिणामकरक ठरू शकतात. देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात, त्यात १.८० लाख लोकांचा बळी जातो, बळी जाणाऱ्यांत तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, असे स्पष्ट करीत गडकरी म्हणाले की, अपघातात जखमीं झाल्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येणाऱ्यांची संख्या कितीतरी मोठी आहे. यामुळे त्या कुटुंबाचेच नाही तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पनाचेही नुकसान होते.
 
उबेर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दरवर्षी कोणकोणत्या उपाययोजना करते, पावले उचलते, याचा आढावा सुरज नायर यांनी घेतला. सुरक्षेची कोणतीही अंतिम मर्यादा नसते, दरवर्षी त्यात परिस्थितीनुरूप सुधारणा कराव्या लागतात, केल्या जातात, कारण प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आमची नेहमीच भूमिका असते, असे ते म्हणाले.