मुंबई
pandavkada waterfall राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत अपघात, दरडी कोसळणे आणि पूरस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंत कोसळण्याच्याही घटना नोंदवण्यात आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पनवेलमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.
पनवेलजवळील खारघर परिसरातील पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघेही चोरवाटेने धबधब्याच्या परिसरात गेले होते. त्यापैकी एक तरुण 19 वर्षांचा असून दुसरा 20 वर्षांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या खारघर अग्निशमन दलाकडून या दोघांचा शोध सुरू आहे, मात्र अंधार आणि पाण्याचा वाढलेला प्रवाह यामुळे शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली आहे. पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना आधीच बंदी घालण्यात आलेली असतानाही हे दोघे चोरवाटेने तेथे गेले होते. यातील एक तरुण मुंबईचा तर दुसरा नवी मुंबईचा असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नालासोपारा पूर्व pandavkada waterfall येथील जीवन नगर परिसरात पुराच्या पाण्यात वाहून आलेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक घटना जुन्नर तालुक्यातील इंगळून घाट परिसरात घडली असून दरड आणि माती रस्त्यावर आल्याने दुपारपासून वाहतूक मंदावली आहे. तर दुसरी घटना लोणावळा परिसरातील कातळ धबधब्याजवळील रस्त्यावर घडली असून ती दरड जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने कोकण, मुंबई उपनगर आणि घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.