नवी दिल्ली,
operation sindoor ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने स्वदेशी लष्करी उपकरणांच्या उत्पादनांवर भर दिली. आत्मनिर्भरतेवर लक्ष्य केंद्रीत केल्याने भारताने संरक्षण निर्यातीत सर्व विक्रम मोडले. २०१३-१४ मध्ये केवळ ६८६ कोटी रुपये असलेली निर्यात आता ५७ पटींनी वाढून ३८,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, एकूण उत्पादनाने १,७८,००० कोटींचा टप्पा ओलांडल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिली. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, सुमारे ८-९ वर्षांपूर्वीच्या ४६,००० कोटी रुपयांच्या तुलनेत भारताचे संरक्षण उत्पादनाने १,७८,००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर ‘मेड-इन-इंडिया’ संरक्षण प्रणालींवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. भारताने संरक्षण निर्यातीचा आकडा लवकरच ४०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक स्वदेशी बनावटीच्या संरक्षण प्रणाली आणि शस्त्रास्त्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाची ताकद दिसून आली. या मोहीमेनंतर स्वदेशी लष्करी उपकरणांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले. सद्यस्थितीत भारताने लष्करी उपकरणांच्या उत्पादनांचे आणि निर्यातीचे मागील सर्व विक्रम मोडले आहे.
सुरक्षेसाठी एआयचा वापर
तिन्ही दलामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याला सरकारचे प्राधान्य आहे. ड्रोन आणि मानवरहित उपकरणांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. नुकतेच सरकारने ५२ हजार कोटींची लष्करी शस्त्रे, हवाई संरक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या खरेदीसाठी मान्यता दिली. येणाऱ्या काळात संरक्षण क्षेत्रात उपयोगात येणाऱ्या एआय आधारित साधनांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.