अनिल कांबळे
नागपूर,
nagpur cyber crime फक्त बारावा वर्ग शिकलेल्या सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने राजस्थानमधून एका सराईत सायबर गुन्हेगाराला अटक केली. बेलतरोडी पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले. आरोपी देशातील विविध राज्यांमध्ये नोंद असलेल्या आणखी चार सायबर गुन्ह्यांमध्येही ‘वॉन्टेड’ असल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संदीप महेंद्र दान चारण (२९), रा. खुडिया गाव, चुरू (राजस्थान) असे आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील आणखी सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. रघुनाथ प्रसाद कुमार गुजर (५७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाइन फसवणूक करून त्यांची ३ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी बाबुराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने आंतरराज्यीय शोधमोहीम राबविली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील खुडिया गावात लागला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
देशभरातील पाच गुन्ह्यांमध्ये सहभाग
चौकशीत आरोपी पुणे शहर सायबर पोलिस ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पोलिस ठाणे, जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिस ठाणे तसेच राजस्थानमधील रतनगड परिसरात नोंद असलेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही फरार असल्याचे समोर आले आहे.
तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर
आरोपीचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले असले तरी त्याला तांत्रिक बाबींचे चांगले ज्ञान होते. त्याच ज्ञानाचा वापर करून तो नियोजनबद्ध पद्धतीने ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजस्थानातील कोटा न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवून त्याला नागपुरात आणण्यात आले असून पुढील तपासासाठी बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश अहेर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-४चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.