नागरिकांची चौकशीची मागणी
मारेगाव,
road from Sindhi to Kumbha bus stop तालुक्यातील सिंधी गावापासून कुंभा बसस्टॉपला जोडणारा महत्त्वाचा रस्ता अवघ्या तीन महिन्यांपूर्वी नव्याने बांधण्यात आला होता. मात्र बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सिंधी गावाजवळील नाल्याला आलेल्या पुराने पुलावरील रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला. पहिल्याच दमदार पावसात रस्ता खचल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्याच्या बांधकामादरम्यान नागरिकांकडून तक्रारी वारंवार होत होत्या. मात्र संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी व अभियंत्यांनी या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असे नागरिकांचे म्हणने आहे. मात्र पहिल्याच दमदार पावसात रस्ता वाहून गेल्याने निकृष्ट कामाच्या संशयाला बळ मिळाले आहे.
रस्ता वाहून गेल्यामुळे पुलाजवळ मोठे खड्डे निर्माण झाले असून डांबरीकरणाचा थरही उखडून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून वाहनचालक, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित रस्त्याच्या बांधकामाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.