आळंदी
alandi flood आषाढी वारी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या पुरामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे आणि शहराला जोडणारे सर्व ४ प्रमुख पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाने आळंदीचा संपर्क सध्यातरी सुरक्षेसाठी तोडला असून भाविकांना प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे.
नदीवरील ४ पूल बुडाले; संपर्क तुटला
alandi flood सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीचे पात्र धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. शहराला जोडणारे 4 प्रमुख पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीत जाणे आता अत्यंत असुरक्षित आणि धोकादायक बनले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने हे सर्व वाहतुकीचे मार्ग तातडीने बंद केले आहेत. वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत, परंतु निसर्गाच्या या प्रकोपामुळे त्यांनी आधी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून भाविकांना आवाहन
alandi flood आळंदीत निर्माण झालेली पूरपरिस्थिती पाहता प्रशासनाने आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलेल्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना महत्त्वाची विनंती केली आहे. प्रवासात असणाऱ्या भाविकांनी सध्यातरी आळंदीत येण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाविकांनी ज्या ठिकाणी प्रवास थांबवला आहे, त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस यंत्रणेकडून नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या परिसरात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.