इंग्लंडविरुद्ध भारताचा 'डू ऑर डाय' सामना

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नॉटिंगहॅम,
india vs england भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ अडचणीत सापडला असून, तिसरा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताला चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघ सध्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असून, पुढील सामना गमावल्यास मालिका जिंकण्याच्या आशा संपुष्टात येणार आहेत.
 
india vs england
 
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून, एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध सलग दोन सामने गमावत भारताला प्रथमच त्या संघाकडून व्हाईटवॉशचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तर दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभव पत्करावा लागला.
मालिकेतील तिसरा टी-२० सामना मंगळवार, ७ जुलै रोजी ट्रेंट ब्रिज येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना सकाळी १०.०० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणे भारतीय संघासाठी अत्यावश्यक आहे. कारण या सामन्यात पराभव झाल्यास भारताला मालिका जिंकण्याची संधी गमवावी लागेल.
दरम्यान, भारतीय संघाला अद्याप आपला सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निश्चित करता आलेला नाही. जवळपास प्रत्येक सामन्यात संघरचनेत बदल करण्यात येत आहेत. मागील सामन्यात वैभव सूर्यवंशी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो स्वस्तात बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी संघ व्यवस्थापन कोणत्या अंतिम अकराला संधी देते आणि त्याचा संघाच्या कामगिरीवर काय परिणाम होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.