मुंबई
neeti taylor प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नीती टेलर हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत धक्कादायक अनुभव प्रथमच सार्वजनिकरीत्या उघड केला आहे. ‘कैसी ये यारियाँ’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री एका हिंसक आणि विषारी नात्यातून बाहेर पडताना तिला शारीरिक तसेच मानसिक छळ सहन करावा लागल्याचे तिने सांगितले आहे. या खुलाशानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या धैर्याचे कौतुक करत तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे.
‘द ट्रेटर्स: अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये बोलताना नीती टेलरने तिच्या भूतकाळातील नात्याबद्दल प्रथमच सविस्तर भाष्य केले. तिचा एक्स बॉयफ्रेंड अत्यंत हिंसक स्वभावाचा होता, असे सांगत तिने केलेल्या अनुभवांचा उल्लेख केला. ती म्हणाली, “त्याने मला सिगारेटने चटके दिले होते. एका रात्री त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो स्वतःवरील ताबा गमावून बसला आणि त्याने मला जोरात कानाखाली मारली. त्या क्षणी मी ठरवलं की हे नातं कायमचं संपवायचं.”
नीतीने पुढे स्पष्ट केले की, जेव्हा नातं शारीरिक अत्याचाराच्या टप्प्यावर पोहोचले, तेव्हा तिने स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ते नातं संपवण्याचा निर्णय घेतला. त्या कठीण काळानंतर तिने स्वतःला सावरत आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला.भूतकाळातील आठवणी सांगताना ती म्हणाली की, त्या वेळी ती खूप लहान होती आणि तिला पुरेशी समज किंवा मॅच्युरिटी नव्हती, त्यामुळे सुरुवातीला त्या व्यक्तीचे खरे स्वरूप ओळखता आले नाही. मात्र, सहनशीलतेची मर्यादा संपल्यानंतर तिने मागे वळून न पाहता त्या नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
याच कार्यक्रमात नीती टेलरने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवरही प्रतिक्रिया दिली. तिचे ऑगस्ट 2020 मध्ये परीक्षित बावा यांच्यासोबत लग्न झाले होते. 2024 मध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या अफवांवर मौन का बाळगले, यावर ती म्हणाली, “प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते. जर माझ्या वैयक्तिक आयुष्यात लोक म्हणतात तसे काही घडलेच नसेल, तर मी स्पष्टीकरण का द्यावे?”
2009 मध्ये अवघ्या 15व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नीती टेलरने अनेक लोकप्रिय मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या खुलाशानंतर घरगुती हिंसा आणि विषारी नातेसंबंधांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.