सेलू,
pandharpur wari ज्ञानोबा-तुकाराम, संत केजाजी महाराजांचा नाम जप,माऊली-माऊलीच्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात घोराड येथील संत केजाजी महाराज वारकरी पायदळ दिंडीने आळंदीकडे प्रस्थान केलेे. यंदा या दिंडीच्या वारीचे २३ वे वर्ष असून ग्रामस्थांनी वारकर्यांना गावाच्या सीमेवर निरोप दिला.विशेष म्हणजे, घोराड गावातून आळंदीकडे प्रस्थान करणारी ही पहिली दिंडी आहे. गेली २३ वर्षे अखंडपणे वारीची परंपरा जपत ही दिंडी संतांच्या विचारांचा आणि भक्तीचा संदेश देत आहे.
प्रस्थानापूर्वी दिंडीतील वारकर्यांनी विठ्ठल रुख्माई देवस्थानमध्ये भजन आणि आरती केली. त्यानंतर भगव्या पताका फडकवत, दिंडी भवानी मंदिरात आली येथे दिंडीचा दिवसाचा मुक्काम होता. येथून ही दिंडी सायंकाळी ४ वाजता गावातील मुख्य मार्गांनी सेलू विकास चौक गावाच्या सीमेवर आली येथून आळंदीकडे खाजगी वाहनाने मार्गस्थ झाली. महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालवारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या दिंडीचे नेतृत्व दिंडीचालक नरेश महाराज गुघाने करीत असून विणेकरी हभप पुरुषोत्तम गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी वारीचा प्रवास करीत आहे.
दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून रस्ता सजविला होता. जागोजागी कुमकुम तिलक लावला जात होता जागोजागी वारकर्यांचे स्वागत केले. दिंडीचे आयोजन अखिल भारतीय महा वैष्णव वारकरी सेवा संस्था यांचे वतीने करण्यात आले आहे.