तेहरान,
Saddam, Gaddafi, and Khamenei इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीला जमलेल्या अभूतपूर्व गर्दीने जगाचे लक्ष वेधून घेतले. जुलै २०२६ मध्ये झालेल्या या अंत्यसंस्कारासाठी इराणने हवाई हद्द तात्पुरती बंद केली, सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आणि अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तब्बल १५ ते २० दशलक्ष नागरिक अंत्यविधीत सहभागी झाले. इतिहासातील सर्वात मोठ्या अंत्यविधींपैकी एक म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जात आहे. मात्र, याउलट इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन आणि लिबियाचे माजी नेते मुअम्मर गद्दाफी यांच्या अंत्यसंस्कारांना अत्यल्प उपस्थिती होती. या तफावतीमागील कारणांचा उलगडा परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांनी केला आहे. जेएनयूचे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉ. राजन कुमार यांच्या मते, सद्दाम हुसेन आणि मुअम्मर गद्दाफी हे धर्मनिरपेक्ष हुकूमशहा होते. त्यांची सत्ता लष्करी ताकद, दडपशाही आणि वैयक्तिक निष्ठेवर उभी होती. सद्दाम यांनी १९७९ ते २००३ अशी २४ वर्षे इराकवर राज्य केले, तर गद्दाफी यांनी १९६९ ते २०११ या कालावधीत ४२ वर्षे लिबियाचे नेतृत्व केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजवटीचाही अंत झाला. कोणताही धार्मिक वारसा किंवा श्रद्धेचा आधार नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारांना मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
याउलट, अयातुल्ला अली खामेनेई हे केवळ राजकीय नेता नव्हते, तर शिया इस्लाममधील सर्वोच्च धार्मिक मार्गदर्शक होते. इराणमधील 'विलायत-ए-फकीह' या व्यवस्थेनुसार सर्वोच्च नेत्याला धार्मिक आणि राजकीय अशा दोन्ही प्रकारचे अधिकार असतात. १९८९ ते २०२६ या ३७ वर्षांच्या कार्यकाळात खामेनी यांनी धार्मिक नेतृत्वाची प्रतिमा निर्माण केली होती. शिया परंपरेनुसार धार्मिक नेत्याच्या अंत्यविधीत सहभागी होणे हे श्रद्धेचे कर्तव्य मानले जाते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरचा अंत्यविधी हा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता धार्मिक भावनेचा विषय ठरला.३० डिसेंबर २००६ रोजी ईद-उल-अजहाच्या दिवशी सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर पहाटे ४ वाजता त्यांच्या मूळ गाव अल-अवजा येथे अत्यंत गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. एका वृत्तानुसार, या वेळी केवळ सुमारे १०० लोक उपस्थित होते. नंतर हजारो लोकांनी त्यांच्या कबरीला भेट दिली असली, तरी सुन्नी उठाव भडकण्याच्या भीतीने अंत्यसंस्कार सार्वजनिक करण्यात आले नव्हते.
२० ऑक्टोबर २०११ रोजी मुअम्मर गद्दाफी यांची बंडखोरांनी हत्या केली. त्यांचा मृतदेह मिसराता येथील शीतगृहात चार दिवस ठेवण्यात आला होता, जिथे हजारो लोकांनी तो पाहिला. मात्र, अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना वाळवंटातील अज्ञात ठिकाणी गुप्तपणे दफन करण्यात आले. त्यांची कबर जाहीर करण्यात आली नाही, कारण त्यामुळे देशातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती होती. इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना 'शहीद' घोषित करण्यात आले. शिया इस्लाममध्ये शहीदाचा मृत्यू सर्वोच्च सन्मान मानला जातो. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीत सहभागी होणे ही धार्मिक श्रद्धा आणि शहादतीला आदर व्यक्त करण्याची संधी मानली गेली.
त्याचवेळी इराण युद्धाच्या परिस्थितीत होता. नव्याने सर्वोच्च नेते म्हणून घोषित करण्यात आलेले मोजतबा खामेनेई गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली होती, तर देशावर आंतरराष्ट्रीय दबाव आणि अंतर्गत संघर्षाचे सावट होते. अशा परिस्थितीत भव्य अंत्यविधीद्वारे इराणी राजवटीला अजूनही जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचा संदेश जगाला देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी सरकारने नागरिकांना मोफत प्रवास, भोजन आणि निवास उपलब्ध करून दिला. शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली तसेच १४ हजार पत्रकारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले. जेएनयूचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. के. पाशा यांच्या मते, सद्दाम आणि गद्दाफी यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या राजवटी आधीच कोसळल्या होत्या. सद्दाम यांना अमेरिकेच्या पाठिंब्याने इराकी सरकारने फाशी दिली होती, तर गद्दाफी यांचा अंत नाटो समर्थित बंडखोरांच्या कारवाईत झाला. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारांना सार्वजनिक स्वरूप देण्याऐवजी शांतपणे पार पाडण्यात आले. याउलट, खामेनेई यांच्या अंत्यविधीला १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. युद्धानंतरही इराण आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेला नाही, हा संदेश देण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा मानला गेला. त्यामुळे खामेनेईचा अंत्यविधी केवळ एका नेत्याचा निरोप नव्हता, तर धार्मिक श्रद्धा, राजकीय शक्तीप्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय संदेश यांचा संगम ठरला.