गडचिरोली,
free heart surgeries गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त बालकांसाठी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ड. आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या विशेष पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्यदूत फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाल हृदय तपासणी शिबिरात 346 बालकांची अत्याधुनिक टू-डी इको तपासणी करण्यात आली. त्यापैकी 52 बालकांवर लवकरच हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, आणखी 10 बालकांची मुंबई येथे सविस्तर तपासणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा एकूण 62 बालकांचा या उपक्रमात समावेश आहे.
या 62 बालकांसाठी गडचिरोली ते मुंबई प्रवास, पालकांसह निवास व भोजन व्यवस्था, रुग्णालयातील उपचार, हृदय शस्त्रक्रिया तसेच आवश्यक वैद्यकीय सेवांचा संपूर्ण खर्च मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहणार्या कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार आहे.
गडचिरोलीतील गरजू बालकांना मुंबईतील अत्याधुनिक हृदयरोग उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहपालकमंत्री ड. आशिष जयस्वाल यांनी डॉ श्रीकांत शिंदे वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्य दूत फॉउंडेशन आणि संबंधित संस्थांशी सातत्याने समन्वय साधत या उपक्रमासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर बाल हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांना वेळेत मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत.
यावेळी सहपालकमंत्री ड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे कोणतेही बालक उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व 62 बालकांना सुरक्षितपणे मुंबई येथे नेणे, त्यांच्या पालकांच्या राहण्याची व्यवस्था करणे, उपचार व शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलणे तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
गडचिरोलीत 346 बालकांची हृदय तपासणी करून त्यापैकी 62 बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम जिल्ह्यातील बाल आरोग्य सेवेला नवे बळ देणारा ठरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील हृदयविकारग्रस्त बालकांना अत्याधुनिक उपचारांची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.