सातारा
maharashtra rain tragedy राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि इतर दुर्घटना घडत आहेत. या पावसाळी आपत्तीमध्ये राज्यात विविध ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये तब्बल 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सातारा, गोंदिया, पनवेल, जळगाव आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये घडलेल्या या दुर्घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी वीजेचा धक्का आणि पाण्यात बुडून नागरिकांचा मृत्यू झाला.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर ही घटना घडली. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चारही जणांचा जीव गेला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. किसन शिंदे, सचिन शिंदे, गंगुबाई शिंदे आणि आरती शिंदे अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगावmaharashtra rain tragedy तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यावरील पुलावरून पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधानंतर सापडला. जांभुरटोला येथील रूपचंद प्रेमिलाल बोपचे (वय अंदाजे 43 वर्षे) हे 5 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास शेतीच्या कामासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. वाहनाचा तोल गेल्याने ते दुचाकीसह प्रवाहात वाहून गेले.घटनेनंतर स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने त्यांचा तत्काळ शोध लागला नाही. अखेर 7 जुलै रोजी परिसरातील नागरिकांना नाल्यात एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पनवेलमध्येही पावसाच्या पाण्याने दोन maharashtra rain tragedy जणांचा बळी घेतला. 5 जुलै रोजी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या विचुंबे येथील नयन म्हात्रे यांचा मृतदेह 7 जुलै रोजी सकाळी गाढेश्वर धरणाच्या पाण्यात आढळून आला. अग्निशामक दलाने पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे पाठवला.5 जुलै रोजी नयन म्हात्रे, सुमित पवार, रत्नेश तुपे यांच्यासह 11 जण वाघाची वाडी परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुमित पवार आणि नयन म्हात्रे हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यामध्ये सुमित पवार यांचा बुडून मृत्यू झाला, तर नयन म्हात्रे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी 5 आणि 6 जुलै रोजी पनवेल तालुका पोलीस, शोध व बचाव पथक तसेच एनडीआरएफकडून मोहीम राबवण्यात आली होती. अखेर 7 जुलै रोजी गाढेश्वर धरण परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे खदाणीत बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. सेल्फी काढताना एका मुलाचा तोल गेला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघेही पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. मानव बंटी रतनानी (वय 14), कार्तिक विकी उधवानी (वय 14) आणि दिनेश विजय पंजवानी (वय 17) अशी मृत मुलांची नावे आहेत. पावसामुळे खदाणीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. एकाच वेळी तीन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथेही हृदयद्रावक घटना घडली. खेळता खेळता दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. विहान विकास पोहनकर असे मृत बालकाचे नाव आहे. विहान घराच्या अंगणात खेळत असताना अचानक तोल जाऊन तो सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पावसाळ्यात वाढणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नदी, नाले, धबधबे, खदाणी आणि पाण्याच्या साठ्यांजवळ जाताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.