सिंदी (रेल्वे)
soybean seeds यावर्षी खरीप हंगामात अनेक नामवंत कंपन्यांच्या वतीने बाजारात पाठवलेले सोयाबीन तसेच कपाशीचे बियाणे मुदतीनंतर उगवलेच नाही. मात्र, यासंदर्भातील तक्रारी कुठे कराव्या, असा पेच शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. एका पक्षाच्या नेत्याने डोळे वटारताच त्याला दुप्पट नुकसान भरपाई देऊन त्याच्या हातापाया दुकानदार पडला. बाकी शेतकर्यांना मात्र उडवून दिले.
यावर्षी शेतकर्यांनी समाधानकारक पावसाचे आगमन झाल्यानंतर पेरणी केली. परंतु, काही मोजक्या कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. मागीलवर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाने आक्रमण केल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. यावर्षी तरी सोयाबीनचे उत्पन्न समाधानकारक होईल या अपेक्षेने अनेक शेतकर्यांनी पेरणी केली. प्रारंभी, मृग नक्षत्र कोरडे गेले तरी आद्र्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांनी कपाशी पाठोपाठ सोयाबीनची पेरणी केली. मात्र, काही नामवंत कंपन्याचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची सरकट कैफियत आहे. शेतकरी उन्हाळ्यातच शेतीची मशागत करून पावसाची वाट बघत होता. आद्र्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडला. शेतकर्यांनी अनेक कंपन्यांचे बियाणे खरेदी केले. परंतु, त्यापैकी काही नामांकित कंपन्याचे सोयाबीन बियाणे जमिनीतून निघालेच नसल्याची ओरड आहे.
महागडे सोयाबीन बियाणे कृषी केंद्रातून खरेदी केले. काही कंपन्यांचे बियाणे दोन-चार दिवसात अंकुरले. मात्र, अनेक शेतकर्यांचे बियाणे विहित मुदतीनंतरही उगवले नाही. मोजक्या शेतकर्यांनी संबंधित कृषी केंद्रचालकांच्या माध्यमातून बियाणे उत्पादक कंपनीच्या अधिकार्यांना बोलावले. शेताची पाहणी केली आणि शेतकर्यांना बियाणे बदलवून दिले. एवढेच नाही तर काही शेतकर्यांना पेरणीचा खर्च देखील अदा केले.
सततच्या नापिकीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन उगवले नसल्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. सोयाबीन सोबतच एका सुपरिचित कंपनीचे कापूस बियाणे देखील उगवले नाही, अशी तक्रार आहे. यासंदर्भात देखील त्या कंपनीने शेतकर्यांशी तडजोड केल्याचे अनेकांनी सांगितले. कांढळी येथील लक्ष्मण गोल्हर यांनी शेतात सोयाबीनच्या २२ बॅगची पेरणी केली. मात्र, त्यांचे बियाणे उगवलेच नाही. या शेतकर्याच्या शेतात दुसर्या कंपनीचे बियाने कबड्डी खेळते असताना दुसर्या कंपनीचे बियाणे मात्र शेतीला ‘बुस्टर’ देऊ शकले नाही. परिसरातील किमान ७० शेतकर्यांच्या बियाण्यांबद्दल तक्रारी आहेत.