मुंबई
sugar prices जून महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा परिणाम आता साखरेच्या दरांवर दिसून येत आहे. कमी पावसामुळे उसाच्या पिकाला फटका बसल्याने बाजारातील साखरेच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात ६ ते ७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती उद्योग क्षेत्रातील आकडेवारीतून समोर आली आहे.
देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये साखरेचा दर अंदाजे ३८.५ रुपये प्रति किलोवरून वाढून ४१.५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. तर कोल्हापूरच्या बाजारात साखरेच्या घाऊक दरात एका महिन्यात ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, हा दर अंदाजे ४,१२० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत या दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारातही जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आणि जूनमधील अपुऱ्या पावसामुळे उसाच्या पिकाबाबत चिंता निर्माण झाली होती. त्याचवेळी अधिक मास संपल्यानंतर लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम आणि सणांच्या तयारीमुळे साखरेच्या मागणीतही वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील या बदलामुळे बाजारात साखरेच्या किमती वाढल्या आहेत.दरम्यान, जुलैच्या सुरुवातीला अनेक राज्यांमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे उभ्या उसाच्या पिकाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात मान्सून सामान्य राहिल्यास उत्पादनावरील परिणाम कमी होऊन साखरेचे दर स्थिर होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भविष्यातील संभाव्य पुरवठा संकट sugar prices आणि ‘एल निनो’च्या परिणामाचा विचार करून सरकारने मे महिन्यात साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत बाजारात पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे आणि सणासुदीच्या काळात दर नियंत्रणात ठेवणे हा या निर्णयामागील उद्देश होता. सध्या बाजाराचे लक्ष मान्सूनची स्थिती आणि उसाच्या उत्पादनावर केंद्रित झाले असून, भविष्यातील साखरेचे दर याच घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहेत.दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात भारताने साखर निर्यातीचा कोटा २० लाख टनांपर्यंत वाढवला होता. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या १५ लाख टनांच्या कोट्यात आणखी ५ लाख टनांची भर घालण्यात आली होती. मागील वर्षी उत्पादनात घट झाल्यानंतर या हंगामात अतिरिक्त साठा निर्माण करून निर्यातीची संधी मिळेल, अशी उद्योग क्षेत्राला अपेक्षा होती. मात्र, कमी उत्पादनामुळे पुढील हंगामासाठी सुरुवातीचा साठा कमी राहण्याची शक्यता आहे.या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, चालू हंगामाची सुरुवात ५० लाख टनांच्या सुरुवातीच्या साठ्यासह झाली होती. मात्र, पुढील हंगामाची सुरुवात ४० लाख टनांपेक्षा कमी साठ्यासह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात साखरेच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.